थेऊरमध्ये ‘अजित कृषी’ राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ; भूमिपूजन उत्साहात संपन्न
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
थेऊरमध्ये ‘अजित कृषी’ राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ; भूमिपूजन उत्साहात संपन्न
श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अजित कृषी’ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. हे प्रदर्शन दि. ८ ते १२ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, शेतकरी, उद्योजक आणि कृषी तज्ज्ञांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.
मंडपाच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण तात्या काकडे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन किशोरजी उंद्रे, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब मुरकुटे, माजी संचालक मारुती अण्णा कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी थेऊरचे माजी उपसरपंच दत्तात्रय कृष्णाजी कुंजीर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य वस्ताद विठ्ठल नाना काळे, विलास पैलवान कुंजीर, गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ आप्पा काळे, माजी चेअरमन रमेश आप्पा कुंजीर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक मंचाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, पतसंस्थेचे संचालक दत्तात्रेय तांबे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रसाळ, सोमनाथ चव्हाण तसेच यशवंतचे संचालक मोरेश्वर काळे, गोरक्षनाथ काळे, गोपीचंद काळे, विशाल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनावेळी ज्येष्ठ नेते हिरामण काकडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने आयोजित हे महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन असून ते थेऊरमध्ये होत असल्याचा अभिमान आहे. विविध कंपन्या, हजारो शेतकरी आणि ग्राहक एकाच छताखाली येणार असल्याने या प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे.
प्रदर्शनाचे आयोजक पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी सांगितले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शेवटपर्यंत शेतकरी आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, ठिबक व तुषार सिंचन व्यवस्था, सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, शेती यंत्रसामग्री, पशुपालन, मत्स्यपालन आणि कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि चित्रफितींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाणार आहे.
आतापर्यंत प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग पूर्ण झाले असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील कृषी उद्योजक आणि संस्था सहभाग नोंदवत आहेत. या प्रदर्शनामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट संवाद साधला जाऊन आधुनिक तंत्रज्ञान गावागावात पोहोचण्यास मदत होणार आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





