पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; स्कॉर्पिओ झाडावर आदळली, एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कोरेगाव मूळ (ता. हवेली): पुणे-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पिओ
गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात शुक्रवारी (ता. २३) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील मृत व्यक्तीचे नाव गौरख त्र्यंबक माने (रा. कंधर, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे असून जखमींमध्ये समाधान अंकुश बाबर (वय २५, धंदा व्यवसाय, रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), विजय सूर्यकांत माने (रा. कंधर, ता. करमाळा, जि. सोलापूर) व अलिकेश खान (रा. बिहार) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान बाबर यांचे मामा विजय माने,चुलत मामा गौरख माने व त्यांचा भागीदार अलिकेश खान असे चौघेजण मुंबई येथे केळी एक्सपोर्ट संदर्भातील मीटिंगसाठी गेले होते. मीटिंग आटोपून गुरुवारी संध्याकाळी ते मुंबईहून करमाळ्याकडे रवाना झाले. शुक्रवारी पहाटे हडपसर परिसरात आल्यानंतर काही वेळाने विजय माने हे स्कॉर्पिओ चालवण्यासाठी बसले.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयागधाम फाटा, कोरेगाव मूळ जवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर स्कॉर्पिओ रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली उतरून झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओचा चेंदामेंदा झाला.
या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले, तर गौरख माने यांच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, हरिष शितोळे, अमोल राऊत व बाळू चोरमले घटनास्थळी दाखल झाले. कस्तुरी रुग्णवाहिकेचे माऊली लाड, संतोष झोंबाडे व रतन चव्हाण यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उरुळी कांचन येथील सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान गौरख माने यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. ४२-बीएस-३८५५) चालक विजय सूर्यकांत माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





