साष्टे-कोलवडी-केसनंद-तळेराणवाडी-आव्हाळवाडी येथील शिवरस्ता खुला करण्याच्या हालचालींना वेग
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
साष्टे-कोलवडी-केसनंद-तळेराणवाडी-आव्हाळवाडी येथील शिवरस्ता खुला करण्याच्या हालचालींना वेग
पुणे : मौजे साष्टे-कोलवडी-केसनंद-तळेराणवाडी येथील शिवरस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाने वेग दिला असून, यासंदर्भात हवेली तहसील कार्यालयाकडून मोजणी विभागाला मोजणीची तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते.त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख, हवेली कार्यालयाकडून अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या प्रश्नावर आता ठोस हालचाली सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवेली तहसील कार्यालयाकडून मोजणी विभागाला मोजणीची तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाने तहसील कार्यालयाला नोटीस पाठवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. उप अधीक्षक भूमी अभिलेख, हवेली यांनी अपर तहसीलदार लोणीकाळभोर यांना पाठविलेल्या पत्रानुसार, संबंधित शिवरस्ता खुला करण्याची कार्यवाही दिनांक ३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
या कार्यवाहीवेळी संबंधित गावचे मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शिवरस्ता लगतचे शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. तहसील कार्यालय लोणीकाळभोर यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, शिवरस्ता खुला करण्यासाठी आवश्यक सूचना व समन्वय साधण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
सदर रस्ता खुला झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतीमाल वाहतूक, शेतात ये-जा तसेच कृषी कामांसाठी मोठी सोय निर्माण होणार असून, अनेक वर्षांपासून या मार्गाअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशासनाच्या पुढाकारामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्ता खुला करण्याच्या कामामध्ये जिल्हा परिषद सदस्या कोमलताई संदेश आव्हाळे, सुरेखाताई रमेश हरगुडे, कोलवडी-साष्टे गावचे विद्यमान सरपंच विनायक भाऊ गायकवाड तसेच केसनंद गावचे प्रशासक सरपंच विशाल काका हरगुडे यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले.
यासोबतच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे तसेच शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांचे देखील या कामासाठी विशेष योगदान लाभल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शन व पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
विशेष म्हणजे, हा रस्ता भविष्यात वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरू शकतो. तळेराणवाडी मार्गे थेट खराडी बायपासला जोडणी उपलब्ध झाल्यास वाघोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे या रस्त्याकडे केवळ शेतकऱ्यांच्या दृष्टीनेच नव्हे तर वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या पर्यायी मार्गाच्या स्वरूपात पाहिले जात आहे.
या निर्णयामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर रस्ता खुला व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





